वाशिम जिल्ह्यात १७ मे पर्यंत संचारबंदी कायम
वाशिम, दि. ०४ (जिमाका) : कोरोना विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम २ अन्वये जिल्ह्यात ३ मे २०२० पर्यंत संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी यापूर्वी दिले होते. सदर आदेशात बदल करून संचारबंदीचा कालावधी आता १७ मे २०२० पर्यंत वाढविण्यात आला आहे.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग अधिनियम १८९७ लागू करण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रसाराला तत्काळ प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम २ अन्वये संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्री. मोडक यांनी दिले होते. आता हे आदेश १७ मे २०२० पर्यंत लागू राहणार आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांची गर्दी होवू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून अत्यंत आवश्यकता असेल तरच नागरिकांनी कार्यालयात यावे. अन्यथा शासकीय कार्यालयात येणे टाळावे,तसेच सामुहिक निवेदने, अर्ज, तक्रारी, फिर्याद कार्यालयास प्रत्यक्ष येवून सादर करून नये, असे आदेश देण्यात आले होते. हे आदेश आता १७ मे २०२० पर्यंत लागू राहणार आहेत. तसेच जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करणे, बाहेरील जिल्ह्यातील व्यक्तींना जिल्ह्यात प्रवेशास मनाई व अत्यावश्यक कारण वगळता जिल्ह्याबाहेर जाण्यास मनाई करण्याबाबतचा २३ मार्च २०२० रोजीचा आदेश सुद्धा १७ मे २०२० पर्यंत लागू राहणार आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता (१८६० चा ४५) कलम १८८ अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे,असे मानण्यात येईल व संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्री. मोडक यांनी आज निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.