संचारबंदी नियमांचे पालन करा, खरेदीसाठी गर्दी करू नका- जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

 


संचारबंदी नियमांचे पालन करा, खरेदीसाठी गर्दी करू नकाजिल्हाधिकारी हृषीकेश मोडक



  • फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन आवश्यक


वाशिम, दि. ०५ : जिल्ह्यात ४ मे पासून अत्यावश्यक सेवांसह इतरही काही दुकाने, आस्थापना सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यात १७ मे पर्यंत संचारबंदी कायम असून सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंतच्या कालावधीत सुद्धा संचारबंदी आदेशाचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, तसेच खरेदीसाठी गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे.


संचारबंदी काळात जिल्ह्यात काही दुकाने, आस्थापना नेमून दिलेल्या कालावधीत सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी नागरिक खरेदीसाठी गर्दी करताना दिसत आहेत. आपला जिल्हा सध्या ग्रीन झोनमध्ये आहे, मात्र आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यावरील कोरोना संकटाचा धोका टळला, असे समजता येणार नाही. आपल्या जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आपण गेली दोन महिने ज्याप्रमाणे लॉकडाऊन, संचारबंदी नियमांचे पालन केले, त्यानुसार यापुढेही या नियमांचे पालन करावे. अन्यथा आपली आतापर्यंतची मेहनत, कष्ट वाया जाण्याची शक्यता आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी केले आहे. अतिशय आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे. मास्कचा वापर, वैयक्तिक स्वच्छता, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. कोणीही एकाच ठिकाणी गर्दी करू नये. दुकानामध्ये अथवा आस्थापनामध्ये एकाचवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती असणार नाहीत, याची खबरदारी दुकानदार, आस्थापनाधारकाने घेणे बंधनकारक आहे. याचे पालन सर्वांनी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी केले आहे. जिल्ह्यात १७ मे पर्यंत संचारबंदी लागू असून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्ती तसेच संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी  विनाकारण घराबाहेर पडू नये. तसेच अत्यावश्यक सेवांसह इतर परवानगी दिलेली दुकानांने यापुढे सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहणार असल्याने नागरिकांनी एकाच दिवशी खरेदीसाठी गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे.